
पोलिस निरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या पोलिस यंत्रणेची प्रतिष्ठा पुन्हा एकदा डागाळली आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा शून्य क्रमांकानं नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत केलेल्या धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की, ‘सन 2023 ते 2024 या कालावधीत दराडे यांनी लग्नाचं आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या कालावधीत मनोर (पालघर) येथील एका फॉर्महाऊसवर तसेच मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील ठिकाणी वारंवार अत्याचार झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. फिर्यादीत असंही नमूद आहे की, ‘सुरुवातीला लग्नाचं आश्वासन देण्यात आलं. मात्र, नंतर अचानक लग्नास नकार दिला, आणि केवळ शिवीगाळच केली नाही तर, जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली’. त्यामुळे त्रस्त होऊन अखेर पीडितेने कायद्याचा दरवाजा ठोठावला आहे. या धक्कादायक घटनेमुळे अहिल्यानगर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांतही संतापाचं वातावरण असून, सामान्य नागरिकांचं रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल होण्याची मालिका वाढत असल्याने पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही याच कोतवाली पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा नोंदवल्यानं नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची चौकशी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्याकडून सुरू असून, आरोपी पोलिस निरीक्षकाविरुद्ध पुढील कठोर कारवाईची मागणी होत आहे.
देवीचं दर्शनही अधूरं राहिलं
सप्तश्रृंगी गडावर ज्योत नेण्यासाठी जात असलेल्या एका वाहनाचा नांदुरी-सप्तशृंगी गड घाटात वळणावर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात भिलकोट, ता. मालेगाव येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला असून 11 पेक्षा अधिक भाविकही या अपघातात जखमी झाले आहेत. भिलकोट, ता. मालेगांव येथील शांकभरी नवरात्रोत्सव मित्र मंडळाचे 35 ते 40 कार्यकर्ते दोन वाहनाने दरवर्षीप्रमाणे वणीच्या सप्तशृंगी गडावर ज्योत पेटवून भिलकोट येथे घेऊन जाण्यासाठी 21 सप्टेंबर 2025 रोजी 11 वाजेच्या सुमारास भिलकोट येथून वाहनाने निघाले होते. त्यातील एक वाहन हे नांदुरी-सप्तशृंगी गड घाट चढत असताना गणपती टप्प्यावरील वळणावर आले असता सदर वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर अपघात होऊन हे वाहन पलटी झाले. त्यात वाहनात बसलेले 20 ते 25 कार्यकर्ते वाहनातून फेकले गेले तर, 17 वर्षीय उमेश धर्मा सोनवणे हा या वाहनाखाली दाबला गेल्याने त्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.