शिवसेनेतील पॉवरफुल पितापुत्र ‘कमळ’ धरणार; राष्ट्रवादीतूनही तिघांचा पक्षप्रवेश !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपने महायुतीमधील मित्रपक्षांना जबरदस्त धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्र असलेले रणजित शिंदे यांचा मुंबईत भाजप पक्षात प्रवेश होणार आहे.
भाजपने राष्ट्रवादी सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील ऑपरेशन लोटसचा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षातील सोमेश क्षीरसागर भाजपात घरवापसी करणार आहेत. भाजपच्या ऑपरेशन लोटसने महायुतीमधील मित्र पक्षांना जोर का झटका दिला आहे.
मोहोळ तालुक्यातुन एक हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना
मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्यासह मोहोळ तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह सुमारे एक हजार कार्यकर्ते मुंबई येथे बुधवार २९ ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता शिस्त राहिली नाही, असा आरोप करीत माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमवेत माजी आमदार यशवंत मानेंसह तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे. २९ ऑक्टोबर रोजी भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
एकनाथ शिंदेंना भाजपचा दे धक्का
मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार आहेत. मोहोळच्या क्षीरसागर पिता-पुत्रांची पाच वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोहोळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर हे पितापुत्र सुमारे पाच वर्षांनंतर भारतीय जनता पक्षात घरवापसी करत आहेत.
मोहोळचे क्षीरसागर कुटुंबीय हे आधी जनसंघात आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून १९९९ आणि २००४ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतरची २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तमप्रकाश खंदारे यांना उमेदवारी दिल्यानंतर नागनाथ क्षीरसागर यांनी अपक्ष निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली होती.
फसव्या विरोधकांपेक्षा दिलदार विरोधक बरा : सोमेश क्षीरसागर
क्षीरसागर कुटुंबीयाने आतापर्यंत कायम प्रवाहाच्या विरोधात राजकारण केले आहे. मात्र, फसव्या मित्रांपेक्षा दिलदार विरोधक बरा म्हणून आम्ही पुन्हा भाजपमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.


