मुंबईतील बॉम्बे च्या सर्व खुणा पुसणार – राज ठाकरे
चंदीगड प्रमाणे मुंबई ताब्यात घेण्याचा तर महानगर प्रदेश शेजारील गुजरात राज्याला जोडण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केला.
ठाकरे यांच्या आरोपानंतर बाँबे आणि मुंबईच्या वादावरुन राजकारण सुरु होताच मुंबईतील बाँबेच्या खुणा संपल्याच पाहिजेत अशी राज्य सरकारची भूमिका असून आयआयटीचेही मुंबई असे नामकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत(आयआयटी) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, आयआयटी बाँबेचे नाव आयाआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो. आयआयटीच्या नावातील बॉंबे तसेच ठेवले त्याचे मुंबई केके नाही, हे चांगलेच झाले असे विधान केले होते. जितेंद्र सिंग यांच्या या वक्तव्यावरुन बाँबे विरुद्ध मुंबई असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंग यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत केंद्र सरकारला चंदीगड प्रमाणे मुंबई ताब्यात घ्यायची असून जितेंद्र सिंग यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारडा डाव हाणून पाडण्यासाठी मराठी माणसाने जागे व्हावे असे आवाहन केले आहे.
मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशके यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला केंद्रीय नेत्यांनी सुरुवात केली आहे.
खरतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.
केंद्र सरकारला ‘मुंबई’ हे नाव खटकते, कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतले आहे. त्या देवीची सगळी लेकरे म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसे. तुम्ही आणि तुमचे शहर यांना खुपते आहे. त्यामुळेच केंद्राडा डाव हाणून पाडण्यासाठी फक्त मुंबई नाही तर आता मुंबई महानगर प्रदेशातील तमाम मराठी जनतेने आता तरी डोळे उघडावेत असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे.असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००टक्के शिजत असावा. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवे यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे हे आपण रोज पाहतो आहोतच. त्यामुळे मराठी माणसा जागा हो असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांच्या आक्षेपानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयआयटीच्या बाहेर आयआयटी मुंबई असे फलक लावून आंदोलन केले.


