बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 9 एप्रिल शेवटचा दिवस असून, आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानुसार 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत दुसऱ्यांदा संवाद साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत रोहित पवारांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे.
रोहित पवारांनी एक्सवरुन ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली, असे ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम राहणार की दिल्लीतून नवा आदेश येणार नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
रोहित पवारांचं ट्वीट
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली.
अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर आहे. पण तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी माझी या सर्वांना विनंती आहे आणि या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील, असा विश्वास आहे.
