पडद्यामागील घडामोडी…
चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला सत्तास्थापनेचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत ‘तमिळगा वेत्री कळघम’चे प्रमुख अभिनेता थलपती विजय यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पडद्यामागून हालचाली करत डाव्या पक्षांची मोट बांधल्याने विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा ११८ चा आकडा पार केला आहे. यामुळे दक्षिणेच्या राजकारणात आता एका नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खर्गे यांचा ‘तो’ फोन कॉल अन् गेम पलटला
४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात थलपती विजय यांचा पक्ष १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, बहुमतासाठी १० जागा कमी पडत असल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. सुरुवातीला काँग्रेसने आपल्या ५ आमदारांचा पाठिंबा जाहीर केला, तरीही आकडा ११३ वरच थांबला होता. अशा कठीण प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः सूत्रे हाती घेतली. खर्गे यांनी ‘व्हीसीके’चे अध्यक्ष थिरुमावलवन आणि सीपीआयचे ज्येष्ठ नेते डी. राजा यांच्याशी फोनवर चर्चा केली. भाजप आणि एआयएडीएमकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे गरजेच असल्याचे त्यांनी पटवून दिले. खर्गे यांच्या या मध्यस्थीनंतर डाव्या पक्षांनी टीव्हीके सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
थलपती विजय यांचा सत्तेवर दावा
सहयोगी पक्षांचे समर्थन पत्र हाती पडताच अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईतील राजभवनात राज्यपाल आर. एन. रवी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मित्रपक्षांच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पाठिंबा पत्र राज्यपालांना सुपूर्द केले. २३४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत आता विजय यांच्या आघाडीचे संख्याबळ ११९ झाले आहे. राज्यपाल लवकरच विजय यांना शपथविधीसाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूतील सत्तेचे गणित
तामिळनाडूच्या राजकीय रणांगणात विजय मिळवण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता होती. नव्या समीकरणांनुसार सत्तेचे गणित खालीलप्रमाणे जुळले आहे:
टीव्हीके : १०८ जागा
काँग्रेस : ५ जागा
सीपीआय : २ जागा
सीपीआय-एम : २ जागा
व्हीसीके : २ जागा
एकूण संख्याबळ: ११९ (बहुमतापेक्षा १ जास्त)
