दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
भारत सरकारचा ७५ वा आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम करत असलेल्या “नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया” या कंपनीच्या माध्यमातून देशी वंशाच्या झाडाची लागवड करण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुक्यातील अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.पवनराजे घोगरे व इतर इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्र.९६५जी कि.मी.०/०००ते७२/०००साठी इंदापूर ते तोंडले (टप्पा 3)साठी मौजे इंदापूर ते तोंडले ता.माळशिरस मधील शेतकऱ्यांना भूसंपादन नोटीस देऊन जमीन संपादीत करण्यात आली आहे.
सदर जमीनीच्या संपादनातुन जाणाऱ्या महमार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी व डेरेदार साधारण ३० फूट उंची व तेवढ्याच क्षेत्रफळाची चिंच, वड, पिंपळ, कडूलिंब यासारखे देशी व पर्यावरण पूरक झाडे होती. महामार्गच्या निर्मितीमुळे सरसकट वृक्षतोड करण्यात आली. याच महामार्ग वरील टप्पा 2 मध्ये (बारामती-इंदापूर )बऱ्याच झाडाचे पुनर्लागवड करण्यात आली व ती बहुतांश प्रमाणात यशस्वी झाली व त्या वटवृक्षाचे बहारदारपणा दिसून येतो आहे. परंतु इंदापूर ते तोंडले(टप्पा 3)या पॅकेज मध्ये बारामती- इंदापूर(टप्प्या2) सारखे वृक्षाचे पुनर्वसन किंवा रोपन करण्यात आले नाही.
नियोजित महामार्गावर Ch 83+500 ते Ch 130+200 मध्ये देश वंशाचे वृक्षारोपण करण्यात येईल अशी अपेक्षा करतो. इंदापूर -तोंडले या पॅकेज मध्ये आपल्या देशात अनेक प्रजातीची झाडे आहेत जी दीडशे-दाेनशे वर्ष मजबुतीने उभी आहेत. देशी वंशाचे वृक्ष जसे की वड, पिंपळ, कडुलिंब,चिंच ,जांभूळ, आंबा, कवट या प्रकारची झाडे लावावीत. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी व लोकहित लक्षात घेऊन वरील देशी झाडे लावली जावीत.विदेशी झाडांची लागवड थांबवा; स्थानिक झाडांना प्राधान्य द्या.अलीकडच्या काळात ८० टक्क्यांपेक्षा जास्त लावण्यात येणारी झाडे विदेशी जातीची आहेत. ही झाडे फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात. त्यामुळे, अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी झाडे लावली जातात. मात्र, ही झाडे जैवविविधता नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहे. पावसात राज्यात अनेक ठिकाणे वादळ वाऱ्यामुळे झाडे कोसळून पडण्याच्या घटना घडतात. अलिकडे अशा घटना वाढल्या आहेत. वास्तविक पावसाळा किंवा उन्हाळ्यातही वादळ आले की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र नीट अभ्यास केला की, काही विशिष्ट प्रजातीचीच झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार तुमच्या लक्षात येऊ शकताे. यामध्ये विदेशी झाडांचे प्रमाण सर्वाधिक असते. विदेशी झाडे लावल्यामुळे या घटना वाढल्याचे वनस्पती अभ्यासकांचे मत आहे. रेन ट्री (चिचव्यासारखे बारीक पानांचे), काशिद, साेनमाेहर, गुलमाेहर, विलायती बाभुळ,ग्लिरिसिडिया आदी झाडांचा समावेश आहे.
रस्त्याच्या कडेला मुख्यत्वे भरभर वाढणारी विदेशी झाडे लावण्यात येतात. वेगाने वाढत असल्याने मुळे कमजाेर असतात व त्यांच्या फांद्याही तुलनेने कमकुवतच असतात. ही झाडे लवकर वाढतात आणि लवकर तुटतातही. या तुलनेत देसी झाडे माेठ्या वादळातही मजबुतीने उभी राहतात. दुसरे कारण म्हणजे रस्ते दुरुस्ती, नाल्या बांधकाम आदी विकासकामांमुळेही झाडांची मुळे कमजाेर हाेतात व छाेट्या वादळातही उन्मळून पडतात.काही ठिकाणी पर्यावरण व लोकहितास हानीकारक परदेशी व इतर झाडांची लागवड करण्यात आली आहे.ती झाडे काढून त्याठिकाणी देशिवंशाची झाडे लावली अशी मागणी करण्यात येत आहे.
या संबंधीचे निवेदन मा.प्रकल्प संचालक भा.रा.रा.पा.प.का.ई.पंढरपूर यांना फॅक्स द्वारे पाठवण्यात आले आहे.या वरती अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे,भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका सरचिटणीस सचिन सावंत,भाजपा किसान मोर्चा इंदापूर तालुका सचिव संतोष देशमुख,भाजपा इंदापूर तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब चंदनशिवे, भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका उपाध्यक्ष प्रीतमकुमार देवकर, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अमर भोसले, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष काशिनाथ अनपट,भाजपा इंदापूर तालुका युवा मोर्चा सचिव अमर काळकुटे इत्यादी पदाधिकार्यांनी सह्या केल्या आहेत.
