दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र असतानाच, आमदार बंब यांनी आणखी नवीन बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक बंद करून बरखास्त करण्याची मागणी बंब यांनी केली आहे. त्यांच्या या नवीन विधानाने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर या दोन्ही मतदारसंघाची आता गरज राहिली नसून, शिक्षकांचे प्रश्न इतर आमदार सुद्धा मांडू शकतात असेही आमदार बंब म्हणाले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव मुलाखतीत बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे.
आमदार बंब म्हणाले की, यापूर्वी फक्त 3 टक्के सुशिक्षित लोकं विधानभवनात असायचे, त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. आता सर्वच आमदार सुशिक्षित आहेत. त्यामुळे आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केली गेली पाहिजे. त्यांची आता गरज राहलेली नाहीत. विशेष म्हणजे 20 वर्षांपूर्वीचं हे मतदारसंघ बंद केली पाहिजे होते. शिक्षक आणि पदवीधरचे बहुतांश आमदार शिक्षकांना खोटे सपोर्ट करतात. राहिला प्रश्न शिक्षकांच्या समस्यांचा तर सर्वच आमदार आता सुशिक्षित असल्याने ते शिक्षकांचे प्रश्न सुद्धा विधानभवनात मांडतील, असे बंब म्हणाले.
यावेळी पुढे बोलतांना बंब म्हणाले की, यांच्यामुळे आमच्या पिढ्या बरबाद होऊ लागल्या आहेत. कारण प्रत्येक पालक शाळेत येऊन लढू शकत नाही. यावेळी हे लोकं शासनावर यांचा दबाव वापरतात आणि शिक्षकांवर कारवाईच होऊ देत नाही. शिक्षक लोकं अवैध संघटना चालवतात आणि त्याला हे आमदार पाठबळ देतात. त्यांच्या या अवैध संघटनामध्ये हे आमदार हजर राहतात. त्यामुळे हे शिक्षणाचं बाजारीकरण सुरु असल्याचं बंब म्हणाले.
गावांमध्ये बहुतांश शिक्षकांकडून दबावतंत्र वापरले जातात आणि त्यांना शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधरसंघाच्या आमदारांचे पाठबळ मिळते, त्यामुळे ते इथपर्यंत चालेले आहेत. थोडा आवाज कुणी उचलला की त्यांच्यावर 353 टाकणार, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे दाखल केली जातात, अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केले जातात. म्हणजे कुणालच बोलू द्यायचं नाही. हे सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांमुळे होऊ लागले आहे. त्यामुळे याला आता आम्हाला सर्वाना मिळून बंद करावे लागेल, असेही बंब म्हणाले.
शिक्षक यांच्याविरुद्ध आमदार बंब यांनी घेतलेल्या भूमिकेला शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आमदाराच्या विरोधात आमदार असा वाद पाहायला मिळत आहे. बंब यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देतांना आमदार काळे म्हणाले की, जिल्हा परिषदेचे शिक्षक बोगस कागदपत्रे तयार करून घरभाडे भत्ता उचलत असल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तर शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या नियमात शिथिलता आहे. शिक्षकांनी वेळेवर यावे आणि त्यांचे काम योग्यप्रकारे करावे असा नियम आहे. तसेच तालुक्याचे आमदार हे तालुका मुख्यालयाला राहतात काय? याचाही विचार करावा, अशी टीका आमदार काळे यांनी केली आहे.
