
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील आठवडी बाजारासाठी माल घेऊन जाणाऱ्या आयचर टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याचा टेम्पो राजवाडी जवळ एका नाल्यावर पलटला. यात तीन जण जागीच ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. अजूनही टेम्पोखाली काही व्यापारी दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस उपाधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह बारड आणि मुदखेड पोलीस जखमींना व अडकलेल्या बचावासाठी प्रयत्न करत आहेत. जखमींना मुदखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील व्यापारी हे जिल्हाभरात सर्व आठवडी बाजार करतात. अनेक व्यापारी भाजीपाला, धान्य, आदी साहित्य विकण्यासाठी एका वाहनाने नेहमी तालुकास्तरावर असलेल्या आठवडी बाजारासाठी जातात. नेहमीप्रमाणे बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी हिमायतनगर येथील आठवडी बाजारसाठी मुदखेडचे व्यापारी (एमएच ०४ – जीएफ- २७०५) या आयचर टेम्पोमधून हिमायतनगरकडे जात होते. हा टेम्पो मुदखेड ते भोकर रस्त्यावर असलेल्या राजवाडी जवळ एका वळणावर आला असताना टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो उलटला.यात महंमद हाफिज महंमद हुसेन, मोहम्मद रफीक मोहम्मद अमीन साहब, महंमद चांद महंमद मीरासाहब हे तीन व्यापारी ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अजूनही टेम्पोखाली काही व्यापारी दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात बुधवार सकाळी नऊच्या सुमारास घडला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील, मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, बारडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुगावे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमेना रुग्णालयात पाठविण्यासाठी व काही व्यापारी घटनास्थळावर अडकल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत…
सर्व जखमींना नांदेडच्या आणि मुदखेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली असून महिलांचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.