दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – बहुचर्चित एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आणि शिंदे गटाकडून सलामीलाच गुवाहाटीमुळे चर्चेत आलेले शहाजी पाटील मैदानात उतरविण्यात आले आहे. शहाजी पाटील यांनी सुरुवातीलाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आरे-कारे करत आव्हान दिलं आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, मला वाटतं की, तुमच्याकडे फोन आहे का, त्या उद्धव ठाकऱ्याला फोन करा, त्याला म्हणला दोन मिनिटं इथं येऊन जा, मग कळेल त्याला, असं पाटील यांनी म्हटलं. हे भगवं वादळ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खरी शिवसेना कोणती हे कळेल.
शहाजी पाटील पुढं म्हणाले की, यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांची सभा नेहमी टीव्हीवरुन पाहिली आहे. शिवसेना प्रमुख कुणाला मैद्याचं पोतं म्हणाले, शरद पवार, तुम्ही बिनधास्त नाव घ्या अजिबात लाजू नका. अडीच वर्ष राज्याचे तुकडे केले आहेत. आता आणखी काय करणार आहात, असंही पाटील म्हणाले.
शेतीचे दु:ख आम्हाला माहिती आहे. दिवसभर खुरपून आलेल्या आईचा खांदा किती दुखतो आणि ती तिच्या लेकीला सांगते की माझी सेवा कर…या साऱ्या वेदना शिंदे साहेबांना माहिती आहे. ते दिवसभर रिक्षा चालवायचे, जीवनभर त्यांनी संघर्ष केला. त्या माणसाला राज्याच्या प्रश्नांविषयी नव्यानं सांगण्याची गरज नाही, असंही पाटील यांनी म्हटलं.
