
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घएतला. या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती.
केशवराव धोंडगे हे पाचवेळा आमदार झाले होते तर एकदा खासदार झाले होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असंही म्हटलं जात होतं. कंधार तालु्क्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला होता. समस्या सहन करणाऱ्या, पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी केशवराव धोंडगे आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रश्न उपस्थित केले.
खासदारपदी एकदा आणि पाचवेळा आमदारपद भुषवलेल्या केशवराव धोंडगे यांनी आपल्या कामाचा ठसा कायमच आपल्या आंदोलनातून आणि आपल्या भाषणांमधून तसं आपल्या कार्यातून उमटवला. निर्भिड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सभागृहात उपस्थित राहात असत.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात केशवराव धोंडगे यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या शताब्दीच्या वेळीच सरकार त्यांचा सत्कार करणार होतं. पण करोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केशवराव धोंडगे यांनी शरद पवारांना दिली होती खास उपमा
केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांना बिनचिपळीचा नारद अशी उपमा दिली होती. एवढंच नाही तर वयाची शंभरी पार केल्यावरही ते म्हणायचे की मी शंभरीत असलो तरीही मी शेवटपर्यंत काम करत राहिन. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत पण रंग बदलणारे खूप. सरड्यासारखे रंग बदलणारे खूप असतात असं मत केशवराव धोंडगे यांनी त्यांच्या शंभरीच्या वेळी मत व्यक्त केलं होतं.
औरंगाबादला आकाशवाणी केंद्र व्हावे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे अशा अनेक मागण्या केशवराव धोंडगे यांनी लावून धरल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी विरोधकांना घाम फोडला होता. पण त्यांचे बोलणे मोठे विनोद निर्माण करणारे होते. महाराष्ट्राच्या भेटीला आलेल्या इंग्लंडच्या राणीला वस्त्रालंकार आणि नथ भेट देण्यात आली होती. त्यावरून धोंडगे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकला होता.
दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेले धोंडगे यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली. त्यामुळेच शेकापमध्ये असतानाही त्यांचा कामाचा आणि राजकीय उंचीचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा होता.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. ते पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, मोठमोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. जनतेवरील त्यांचे प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचले. निर्भिड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सभागृहात उपस्थित राहात असत.
1975 साली आणिबाणीचा विरोध करताना 14 महिने कारावास भोगला. यात विशेष म्हणजे, आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले, पण याच नेत्याला 1995च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आणि तोही त्यांनी मोठ्या मानाने स्वीकारला होता.
डि. एस. लोखंडे पाटील
मुख्य संपादक – दै चालु वार्ता