
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : “छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्यरक्षक आहेत. पण त्यांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे.
त्यांच्यावरील हा अन्याय आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढले. ते धर्मवीर आहेतच, त्यांना ते धर्मवीर नाहीत म्हणणे हा द्रोहच”, असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर यावरून वाद सुरू असून तो रस्त्यावर आल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “या देशामध्ये एकच जाणते राजे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणाला त्यांच्या नेत्यांना जाणता राजा म्हणायचे असेल तर म्हणू द्या. जनता म्हणणार नाही.” खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करताना पातळी सोडू नये, असे आवाहन केले. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, “सुप्रिया सुळेंनी जे म्हटलंय त्याचे मी स्वागत करतो. पण सुप्रिया सुळेंनी जे मत मांडलय ते आधी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन टीका राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते सोशल मीडियावर करत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे समर्थन करतोच, आम्ही देखील असेच आवाहन करू.” असेही फडणवीस म्हणाले.