
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
मुंबई:- कृती समितीच्या लढ्याला अंशतः यश, २० फेब्रुवारी पासून चाललेला संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर
२० फेब्रुवारी पासून संपाच्या निमित्ताने आपण सर्व जिल्ह्यांमध्ये प्रकल्प, जिल्हा, आयुक्त कार्यालय पातळीवर जबरदस्त आंदोलने केली. आज आझाद मैदानावर आपली ताकद उतरवली. आपली अपेक्षा होती की राज्य सरकारने भरीव मानधनवाढ द्यावी, मानधनाच्या निम्मी पेन्शन, नवीन मोबाईल, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅच्युइटी लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
आज कृती समितीच्या शिष्टमंडळाला मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त यांनी बैठकीसाठी निमंत्रित केले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी १०% मानधनवाढ द्यायचा प्रस्ताव मांडला तो कृती समितीने नाकारला आणि शेवटी धमासान चर्चेअंती सेविकांना १५००/- मदतनिसांना १०००/- मानधनवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. मिनी अंगणवाडी सेविकांना सेविकांइतके मानधन देण्याचा मुद्दा आपण आग्रहाने मांडला. तो विचाराधीन आहे. पेन्शन योजना लागू करण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले. त्याचा तपशील आयुक्तांनी बैठक घेऊन चर्चा करून ठरवायचा आहे. नवीन मोबाईलसाठी ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अंगणवाडीचे भाडे २०००/- ते ८०००/- इतके वाढवण्याचे मान्य केले. ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबत चर्चा करण्याचे मान्य केले. शिष्टमंडळात एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, कृष्णा भानारकर आणि सरिता कंदले यांचा समावेश होता.
शासनाशी झालेल्या या वाटाघाटीत कृती समितीने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे. उद्यापासून सर्वांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे. आझाद मैदानावरील आंदोलन देखील आपण आज मागे घेतले आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या जिल्ह्यात परत जायचे आहे आणि शक्यतो लवकर अंगणवाड्या सुरू करायच्या आहेत.
भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की आज जे काही मिळाले ते पुरेसे नाही परंतु जे काही मिळाले ते आपण लढून मिळवले आहे. आज आपण १००% उतरलो असतो तर नक्कीच याहून जास्त मिळवून घेऊ शकलो असतो. परंतु आपण उतरवलेली ताकद पणाला लावून शासनाकडून हा अल्प का होईना पण विजय आपण मिळवलेला आहे. पुढील आंदोलनांमध्ये आपण याहूनही जास्त ताकद लावली तर अजून जास्त काही मिळवून घेऊ शकतो. आपण पूर्ण समाधानी नाही आणि कधीही असत नाही. परंतु आपण हे असमाधान पुढच्या आंदोलनात उतरवले पाहिजे आणि उतरवणार आहोत. राज्य सरकारकडून थोडेफार मिळवले आहे आता आपण केंद्र सरकारकडे वळायचे आहे. आपले पुढचे आंदोलन आपण केंद्र सरकारच्या विरोधात करणार आहोत. बजेटमध्ये केंद्र सरकारने मानधन वाढ द्यावी या मागणीसाठी आंदोलन केले जाईल. त्याची लवकरच घोषणा केली जाईल. त्या आंदोलनात सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी उतरावे असे आवाहन कृती समिती करत आहे.
एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर
भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील