
दै.चालू वार्ता
वैजापूर,प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर- पिक विमा संदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर्षी पहिल्यांदाच एक रुपयात पिक विमा भरून घेत जात असल्याने सर्वच शेतकरी पिक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी csc केंद्र चालक व शेतकरी यांन्ही केली होती. याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.