
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन जरांगे पाटलांचा थेट निशाणा…
जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जालन्यात जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणार होते. तसा दौराही आला होता. परंतु आता त्यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्यावरुन जरांगे पाटील यांनी खास त्यांच्या शैलीत टिपण्णी केली.सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी जरांगेंनी समितीसाठी एक महिन्याचा वेळ द्यावा, अशी मागणी केलेली. त्यावर जरांगे यांनी म्हटलं की, खात्रीशीर शब्द दिला आणि मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन शब्द दिला तर उपोषण मागे घेण्यासंदर्भात विचार करु.
त्यानुसार काल मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जालन्याच्या आंतरवाली गावात जावून जरांगे पाटलांचं उपोषण सोडतील, असं सांगितलं जात होतं. तसा दौरादेखील आलेला होता. मात्र आता ऐनवेळी मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती मिळत आहे. ‘साम’ टीव्हीशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री येतील, असं मला वाटत आहे. मुळात ते येणार आहेत, असं अधिकृतपणे मला कुणीही सांगितलं नव्हतं. मात्र सकाळपासून ते येणार आहेत, अशा बातम्या ऐकतोय.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, अर्जुन खोतकर कारखान्याकडे, रिसिव्ह करायला जातोय असं म्हणून निघाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांनाच आणायला गेले असतील, असं वाटतंय. पण तरीही असं अचानक दौरा रद्द होत असेल तर माझं डोकं बंद पडायचं काम झालंय. जरांगे पुढे बोलले की, मला जास्त राजकारण कळत नाही, इतकी फेकाफेकी मी बघितली नाही.
राजकारणात गोम असते… हे लोक शेंगा हाणत आहेत.. तरीही मुख्यमंत्री येतील असा मला विश्वास आहे. असं जरांगे पाटील शेवटी म्हणाले.