
त्यातील सात गुन्हे 307 चे, आरोपांची मालिका सुरूच, आव्हाडांचं खळबळजनक ट्विट
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड हे सध्या अटकेत असून, त्यांच्याविरोधातले अनेक प्रकरणं सध्या समोर येत आहेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावरही वेगवेगळ्या पद्धतीनं गंभीर आरोप होताना दिसत आहेत.
सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी आता रोज एक गंभीर आरोप करत राळ उठवली आहे. आज जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच समोर आणली आहे. यामधून 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत असं म्हणत अनेक गंभीर आरोप केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट
“हभप वाल्मिक अण्णा कराड याच्यावर फक्त 22 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 7 गुन्हे हे भादंवि 307 चे आहेत. कलम 307 मुंबईच्या भाषेत हाफ मर्डर म्हणून ओळखला जातो. ज्या दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो, अशी दुखापत! जर या 22 गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून 220 गुन्हे दाखल होतील. असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस नाही, त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही . अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे रहायचे.
परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते. 307 सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत; तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो. अशा माणसाला वाचविण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे !
परळी, बीड, अंबाजोगाई, माजलगाव अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल असल्याचं आव्हाड यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांवरही जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत.