सोशल मीडियावरील त्या पोस्टवर आदित्य ठाकरे संतापले…
सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत सुरु आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानचा सामना 23 फेब्रुवारी खेळवण्यात आला.
हा सामना दुबईत झाला. भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी मैदानात उपस्थिती लावली होती. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीसोबत अनुराग ठाकूर सामना पाहताना दिसले. यावरुन आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे.
अंधभक्त देशाला कुठे घेऊन जात आहेत ह्याचे हे उदाहरण आहे. मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर यांच्यावर त्यांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जाते, का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे…दोघेही भारतीय, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणारे आहेत. पण हेच ट्रोल्स त्या भाजप नेत्यावर बोलायला घाबरतात, जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटूसोबत काल बसलेला दिसला. ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना “पाकिस्तानला जा” असे वारंवार सांगतो, त्यांचे माजी मंत्री स्वतः रस्त्यावर “देश के गद्दारों को….” च्या घोषणा देतात, तेच काल शाहीद आफ्रिदी सोबत गप्पा मारत होते. मग सांगा, आता देशाचे गद्दार कोण?, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला.
...त्याला देशविरोधी ठरवले गेले असते- आदित्य ठाकरे
विचार करा, जर तो नेता भाजपचा नसता, तर काय झालं असतं?, त्याच्याविरोधात आंदोलनं, एफआयआर झाले असते. त्याला देशविरोधी ठरवले गेले असते आणि त्यालाही “पाकिस्तानला जा” असे म्हटले असते. त्यावर ठराविक प्रसारमाध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच…. दुर्दैवाने, हीच भाजपची नीती आहे; देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा. आत्ताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारत बसले आहेत. ह्यांचे नेते,नेत्यांची मुले परदेशी व्यवसाय करतात.. काही तर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात, मॅच बघतात. बाकीच्यांची मुलं, आमचे तरुणांना मात्र – हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवतात आणि हो, जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी, बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचे सांगितले, तेव्हा ह्याच भाजपशासित बीसीसीआयने मात्र सगळं माहित असूनही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट सामना खेळवला, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे- आदित्य ठाकरे
निवडणुका झाल्याने भाजप आता हिंदूना विसरलंय आणि देशभक्तीही विसरंलय. ..की मग आता भाजपच्या देशभक्तीचा “टाइम प्लीज” आहे?, जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्याचा, भारतविरोधी क्रिकेटपटूसोबत आनंद घेतानाचा फोटो दाखवा आणि विचारा, हे त्यांना मान्य आहे का?, आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे, भाजपसारखी चुनावी नाही. देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करु, पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार-द्वेष सहन केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, कोणासाठीही नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मोहम्मद शामीविरोधात सोशल मीडियावर ती पोस्ट-
मोहम्मद शामी आज त्यांच्या संघाकडून खेळत आहे. प्रत्येक वेळी त्याने विकेट्स घेतल्या आहेत, पण पाकिस्तानविरुद्ध त्याने त्याचा खरा रंग दाखवला, अशी पोस्ट एका अकाऊंटवरुन सोशल मीडियावर करण्यात आली होती.
