
गेल्या महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ व अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील या दोघांचीही मंत्रिपदी वर्णी लागली होती.
त्यावेळी अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्रिपद देण्यात आलं होतं. तर, छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार होता.
त्यामुळे महायुतीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नवीन मंत्रिमंडळात या दोघांना स्थान मिळेल असे वाटत असताना मात्र दोघांनाही मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. त्यामुळे छगन भुजबळ व अनिल पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जवळपास ११ मंत्र्यांना डावलण्यात आलं होतं. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ५ मंत्र्यांचा पत्ता कट झाला. त्यात अनिल पाटील व छगन भुजबळ या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंगोली येथे एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना राज्यमंत्रिडळाच्या विस्ताराबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा भुजबळ व अनिल पाटील यांच्या मंत्रिपदाविषयीच्या चर्चांनी मतदारसंघात जोर धरला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारावेळी अडीच वर्षांनंतर नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल. असा शब्द आपण दिला होता. तो शब्द मी पाळणार आहे. त्यामुळे चिंता करु नका असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे भुजबळ व पाटील समर्थकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. अनिल पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली असली तरी मंत्रिमंपदाची त्यांची असलेली आशा काही लपून नाही.
महायुतीमध्ये तीन घटक पक्ष असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करताना रस्सीखेच पाहायला मिळाली होती. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला होता. त्यामुळे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर काही विद्यमान मंत्र्यांना त्यांची खूर्ची खाली करावी लागेल. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट झाल्यास अनिल पाटील व छगन भुजबळ यांना संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल का हे पाहावे लागणार आहे. त्यासाठी कोणत्या मंत्र्यांना आपली खूर्ची खाली करावी लागू शकते याबाबतची उत्सुकता आतापासूनच शिगेला लागली आहे.
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या ११ आमदारांपैकी एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. पाटील यांचा मतदारसंघात चांगला दबदबा देखील आहे. पाटील यांना मंत्रिपद डावलून ते भाजपचे संजय सावकारे यांना देण्यात आले. तर छगन भुजबळ यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याला डावलून माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळात संधी दिली. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास सावकारे व कोकाटे यांनाच आपली खूर्ची खाली करावी लागेल असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे. मात्र, सध्या तरी भुजबळ व पाटील समर्थकांना मंत्रिमंडळ विस्ताराची आस लागून आहे.