
तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार अन् उद्धव…
मनसे नेते प्रकाश महाजनांवरही त्यांनी हल्लाबोल केला होता. आता नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राच्या शिवसेनेबाबत मोठं विधान केलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी (ता.2 जुलै) मोठं वक्तव्य केलं आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चांनी मोठा ट्विस्ट निर्माण झाला असतानाच राणेंनी आता राज ठाकरेंबाबत आणि शिवसेनेबाबत धक्कादायक विधान करत खळबळ उडवून दिली आहे.
त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) जर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आले तर ते प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे नगण्य राहतील असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच ओरिजनल असल्याचंही राणे म्हणाले आहेत. मराठी आणि हिंदुत्वावर बोलायचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही,दोघांची संख्या काय आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.
यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांनी मुलं कोणाच्या घरी जन्माला येतंय आणि बारसं कोण करतं असा खोचक टोलाही लगावला. तसेच ते जर एकत्र असते तर वेगळे झाले असते का? यांना आता मराठी माणूस आठवला. मराठीसाठी शिवसेना मग मराठी माणसं गेली कुठे? अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. काय केलं मराठी माणसांसाठी? अशी सडकून टीकाही त्यांनी केली.
सध्याच्या घडीला राज्यातील महायुती सरकारला घेरण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही, आम्हाला त्रास काही नाही. दोन भावांनी एकत्र यावं, आम्हांला काही चिंता नाही. यांना आम्ही गिणतीत धरत नाहीत, असा चिमटाही राणेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत काढला.
शिवसेनेच्या नावावर उद्धव ठाकरेंनी उदरनिर्वाह केला.पण ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. ठाकरेंकडे डुप्लिकेट शिवसेना असल्याचा आरोपही राणेंनी केला. पण कोणी कुठे जायचे हा ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न असून राज ठाकरेंना ते शिवसेनेत या असं हे कधीच म्हणू शकत नाही असा हल्लाबोलही राणे यांनी केला.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचं महत्त्व नाही. त्यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस, तरुणांच्या नोकरीसाठी. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काय केलं असा सवालही नारायण राणेंनी केला. तसेच ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही,असंही नारायण राणे यांनी ठणकावलं.