
तटकरेंकडून नाराजी व्यक्त; अजित पवारांचं नाव घेत म्हणाले…
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. आधी शेतकऱ्यांबद्दल केलेलें वादग्रस्त वक्तव्य आणि नंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातच रमी गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे माणिकराव कोकाटे यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसंच कोकाटे यांच्याबद्दल पुढील भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मांडतील, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंधित वादावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, “यासंदर्भात माझं आणि त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही. कारण मी त्यादिवशी लातूर, धाराशिव, सोलापूर अशा दौऱ्यावर होतो. कोकाटे आणि अजितदादांचं काही बोलणं झालं असेल तर मला त्याबाबत माहिती नाही. जबाबदार नेतृत्वाने जे राज्याच्या मंत्रिमंडळात असतील किंवा लोकसभेत, राज्यसभेत असतील त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजितदादा कोकाटेंबाबत भूमिका मांडतील,” असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यातून तटकरेंनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील संभाव्य कारवाईचे संकेत दिल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांनी काल केलेल्या वक्तव्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी आहे, असं कोकाटेंनी म्हटलं होतं. त्यावर कालच्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांनी वापरलेले काही शब्दही योग्य नव्हते, असं तटकरे म्हणाले.
विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी, तटकरे म्हणाले…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होती आङे. यावर तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “विरोधकांनी काय मागणी करावी, हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. मला त्याबाबत जास्त काही बोलायचं नाही. सशक्त लोकशाहीत विरोधी पक्षाने आपली जबाबदारी आपआपल्या पद्धतीने पार पाडावी, असं ते म्हणाले.