
दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा – रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडण्याची नोंद म्हसळा तालुक्यात होत असते.दोन दिवसांत ३५८ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये दिनांक १७ रोजी १४३ मी.मी.तर दिनांक १८ रोजी सकाळी ८ ते पाच वाजेपर्यंत २१५ मी.मी.इतका पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले. म्हसळा तालुक्यात आता पर्यंत एकुण ४०९५ मी.मी.पाऊस पडला आहे.मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यात नदी नाल्यांचे पाण्याची पातळी वाढली आहे.पांगलोळी गावातील सखल भागात पावसाचे व नदी खाडीचे पाणी साचले असल्याने जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला होता.पांगलोळी गावातील रहिवाशी मोहसीन अ.अझीझ धनसे यांच्या घराची पडवी कोसळून वित्त हानी झाली आहे तर लेप गावी एका घरासमोरील संरक्षण भिंत कोसळली आहे.मरियम खार येथील सचिन दौलत पारावे यांच्या घराची मागील भिंत कोसळली आहे.म्हसळा शहरात इम्तियात दळवी यांच्या घरावर विजेचा पोल पडुन घरातील वीज फिटिंग सह संपूर्ण इलेक्ट्रिक साहित्य जळून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हसळा बायपास येथील ईदगा मैदानाची संरक्षण भिंतचे दोन ठिकाणी बांधकाम कोसळले आहे.
ढोरजे गाव मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील काही गावांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता. या मार्गावरून कोणी जावू नये अशी दवंडी पोलिस पाटील यांनी सोशल मीडियावर दिली होती.म्हसळा शहरातील दिघी रोड परिसर,तहसिल कार्यालय येथे गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना रहदारी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीवर्धन आगारातून बोर्ली मार्गे मुंबई,बोरिवली,नालासोपारा,पुणे येथे जाणाऱ्या एस.टी.गाड्या खुजारे येथील राज्य मार्गावर पाणी साचल्याने प्रवासी वाहतूक ठप्प पडली होती.सायंकाळी उशिरा पर्यंत तालुक्यात किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती म्हसळा महसूल विभागात नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सज्ज झाले असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मतदार संघात होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसिल प्रशासनाला दिले आहेत.