
रिलायन्स इंडस्ट्रिज हा देशातील सर्वात मोट्या उद्योग समूहांपैकी एक आहे. या उद्योग समूहाने आतापर्यंत अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केलेला आहे. विशेष म्हणजे हा विस्तार करून रिलायन्स उद्योग समूहाने भरपूर नफा कमवला आहे.
दरम्यान, आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. या उद्योग समूहाने एका नव्या उपकंपनीची घोषणा केली आहे. या घोषनेंतर आता भारतात नवी क्रांती येणार, असे बोलले जात आहे.
मुकेश अंबानी यांनी काय घोषणा केली आहे?
रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) नव्या कंपनीची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव रिलायन्स इंटेलिजन्स असे असेल. तसेच ही कंपनी पूर्णत: रिलायन्सच्या मालकीची असून ती एक अपकंपनी असेल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. भारताला कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात वैश्विक पातळीवर नेतृत्व करता यावे असा उद्देश या कंपनीचा असल्याचे यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.
घोषणा करताना मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले?
सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंटेलिजन्स या कंपनीची घोषणा करताना या कंपनीचे काम काय असेल याबाबतही सांगितले आहे. ही कंपनी प्रामुख्याने चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवणार आहे. या कंपनीच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर एआय डेटा सेंटर तयार केले जाईल. हे डेटा सेंटर अपारंपरिक उर्जेवर चालेल. या डेटा सेंटरची निर्मिती गुजरातमधील जामनगर येथे केली जात आहे.
कोणकोणत्या क्षेत्रात ही कंपनी काम करणार?
मुकेश अंबानी यांची ही नवी कंपनी जगभरातील प्रमुख टेक कंपन्या तसेच ओपन-सोअर्स कम्यूनिटीसोबत काम करेल. भारतातील सामान्य जनता, छोटे व्यावसायिक, मोठे उद्योजक यांना विश्वसनीय एआय सेवा उपलब्ध होतील. शिक्षण, कृषी आदी क्षेत्रातील समस्यांवर एआय आधारित उत्तर शोधण्यासाठी काम केले जाईल. त्यामुळे आता ही कंपनी भविष्यात नेमकी काय क्रांती करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.