
बिहारच्या निवडणुकांबाबत प्रशांत किशोरांचा खळबळजनक दावा…
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारचा दौरा केला.
या दोघांच्याही बिहार दौऱ्यानंतर बिहारमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आरजेडी आणि भाजप, जेडीयू यांच्यातील संघर्ष वाढला आहे. तर दुसरीकडे जनसुराज पक्षाकडूनही विरोधकांवर सातत्याने टीकांचा वर्षाव होऊ लागला आहे. अशातच राजकीय रणनीतीकार आणि ‘जन सुराज’ चळवळीचे नेते प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. बिहारमधील किशनगंज येथे आयोजित बैठकीत त्यांनी जेडीयू व भाजप नेत्यांवर परखड शब्दांत हल्ला चढवला.
बिहारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उलेमा आणि समाजातील प्रमुख चेहऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि विशेष टोप्या वाटण्यात आल्या. व्यासपीठावरून भाषण करताना प्रशांत किशोर यांनी पैगंबर मोहम्मद साहेब आणि धर्माचा उल्लेख करून जनतेकडून पाठिंबा मागितला. सभेला उपस्थित असलेल्या लोकांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. पण तिथे गर्दीमुळे मोठा गोंधळही उडला होता. काही लोकांनी आरोप केला की त्यांना ५०० रुपये आणि जेवणाचे आश्वासन देऊन आणण्यात आले होते, परंतु ते वचन पूर्ण झाले नाही, ज्यामुळे ते संतप्त दिसले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, ‘जर आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे.
रस्त्यावरच्या कुत्र्याशी तुलना – वर्मांच्या आरोपांवर संताप
जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस मनीष वर्मा यांनी किशोर यांच्यावर दारू माफियांशी संगनमत असल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना, रस्त्यावर चालणाऱ्या कुत्र्याशी मी तुलना करत अशा लोकांना उत्तर देणे मला आवश्यक वाटत नाही,” अशा खोचक शब्दांत टिकाही केली.
जयस्वालांच्या नोटिशीवर बोचरी प्रतिक्रिया
भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीवर उत्तर देताना किशोर म्हणाले, “जेव्हा कोल्हा मरणार असतो, तेव्हा तो शहराकडे धावतो. जयस्वालसारखे लोक नोटिशीव्दारे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी अशा १०० नेत्यांनाही घाबरणार नाही.
जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्यास निवृत्तीचा पुनरुच्चार
प्रशांत किशोर म्हणाले की, “जर आगामी विधानसभा निवडणुकीत जेडीयूला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर मी राजकारणातून निवृत्त होईन. पश्चिम बंगालमध्येही भाजपने त्यांना १०० जागा मिळतील असे भाकीत केले होते. पण ते फसले. तसेच जेडीयूचेही होईल.” असा दावा प्रशांत किशोरांनी केला.
मुस्लिम मतपेढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न?
दरम्यान काही लोकांनी सांगितले की, सीमांचल भागात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्याकडून टोप्या वाटण्यात आल्या, धार्मिक भाषणांतून मतपेढीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्नही कऱण्यात आला. पण स्थानिकांनी त्यांच्या या फसवणुकीला बळी न पडण्याची भूमिका घेतली. एकंदरीत किशनगंजमध्ये झालेली सभा प्रशांत किशोर यांच्या वकृत्वशैली, राजकीय टीका आणि निवडणूक रणनीतीमुळे चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली. त्यांच्या कार्यक्रमाबाबतही विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.एकूणच, बिहारच्या आगामी निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांची मोहीम अधिक आक्रमक होत चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.