
भारत-पाक सामन्यावर नेमकं काय म्हटलं?
आशिया चषकात 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान, भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरेंकडून व्यंगचित्र काढत बीसीसीआय आणि आयसीसीवर टीका केली आहे. राज ठाकरेंनी जय शाह आणि अमित शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अरे बाबांनो उठा…आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले…असं म्हणत नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं?, असा सवालही उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनी व्यंगचित्रद्वारे नेमकं काय म्हटलंय?
राज ठाकरेंनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर व्यंगचित्रातून आयसीसी आणि गृह मंत्रालयावर भाष्य करण्यात आलं आहे. नक्की कोण जिंकला? आणि नक्की कोण हरलं? असा प्रश्न व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी विचारला आहे. या व्यंगचित्रात गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय या व्यंगचित्रात आहेत…या व्यंगचित्रात अरे बाबांना उठा! आपण जिंकलो पाकिस्तानी हरले…असं आयसीसी (जय शहा) आणि गृह मंत्रालय(अमित शहा ) त्यांना सांगत आहे.
हस्तांदोलन केलं नाही, हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर झालं का?- संजय राऊत
भारत-पाकिस्तानच्या सामन्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने परवानगी दिल्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळली, असं सुनील गावसकरांनी सांगितले. जर सरकारने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास परवानगी दिली नसती, तर टीम इंडिया खेळली नसती, असंही सुनील गावसकर म्हणाल्याचं संजय राऊतांनी सांगितले. टीम इंडियाने हस्तांदोलन केलं, नाही याचं भाजपवाले कौतुक सांगताय. देशाची जनता मुर्ख आहे का?, तुम्ही पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळलात ना?, देशासाठी लोकांनी रक्त सांडलं, फासावर गेले, अनेक लोक शहीद झाले..आणि तुम्ही हस्तांदोलन केलं नाही, त्याचं कौतुक करताय, हे हस्तांदोलन केलं नाही, हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर झालं का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.