जातीय जनगणनेचा अधिकारच…
कर्नाटकमधील काँग्रेस सरकार राज्यातील मागासवर्गीय आयोगामार्फत जातीय जनगणना पुनर्सर्वेक्षणाला (सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण) मान्यता दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
परंतु केंद्रातील मोदी सरकारने यावर थेट आक्षेप न घेता, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून कर्नाटक सरकारला सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय जनगणना करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे, राज्य सरकारकडे नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे बंगळूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “केंद्र सरकारला जातीय जनगणना करण्याचा अधिकार आहे. परंतु, कर्नाटकसारख्या काही राज्यांमध्ये जात जनगणना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र जनगणना करण्याची योजना आखत असल्याने, राज्य सरकारकडून वेगळी जनगणना करण्याची आवश्यकता नाही.
कर्नाटक सरकारला फटकरात असतानाच, विरोधी पक्षांच्या दबावामुळे केंद्र सरकार जातीय जनगणना सुरू करत असल्याच्या वृत्ताचे देखील मंत्री आठवले यांनी खंडन केले. ‘जातीय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांचा स्वतःचा होता. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)दबावाखाली घेतलेला नव्हता. कर्नाटकमध्ये भाजप आणि धजदने त्यांच्या आरपीआय पक्षाला, युतीत सामील करून घ्यावे. तसेच, काँग्रेसच्या कुशासनाविरुद्ध लढावे, असे आवाहनही मंत्री आठवले यांनी केले.
कर्नाटक राज्याचे आरपीआय अध्यक्ष एम. वेंकटस्वामी यांनी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तर त्यांना विश्वास आहे की ते पुढील मुख्यमंत्री म्हणून दलित व्यक्तीचे नाव प्रस्तावित करतील, असे म्हटले.
90 दिवसांची मुदत
दरम्यान, कर्नाटक सरकारचे काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मागासवर्गीय आयोगाला पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देऊ. तेलंगणमध्ये 70 दिवसांच्या आत सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी आम्ही 90 दिवसांची मुदत दिल्याचे सांगितले.
खर्गेंनी मुख्यमंत्री व्हावे
काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करायला हवे होते. खर्गे हे एक कट्टर दलित नेते आहेत. ते माझे चांगले मित्रही आहेत. आम्ही दोघेही संसदेत एकमेकांना भेटत राहतो, असेही ते म्हणाले. यावेळी गुलबर्गा येथे बौद्ध मठ स्थापन केल्याबद्दल खर्गे यांचे कौतुक केले आणि ते नागपूरमधील दीक्षाभूमीइतकेच महत्त्वाचे असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
वैचारिक लढा सुरूच राहणार
‘मी आधी काँग्रेसशी युती केली होती, आता मी दोन टर्मसाठी भाजपसोबत आहे. मी राज्यसभा सदस्य आहे. आपण सर्व भारतीय आहोत आणि वैचारिक मतभेद असले तरी, आपण चांगल्या सौहार्दाने राहायला हवे’, असेही मत मंत्री आठवले यांनी म्हटले.
