विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत सत्तेत झोकात पुनरागमन केले. मात्र, सत्ता वाटपाच्या तिढ्यामुळे जवळपास दोन आठवड्यांनी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यापूर्वी गृह खात्याच्या मागणीवरून विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.
गृह खाते आणि अर्थ खात्यांवरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही खात्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मौन सोडत भाष्य केले.
विरोधकांशी संवाद साधणार?
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केले. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसोबत संवाद साधण्याच्या मुद्यावर त्यांनी म्हटले की, आम्हाला जनतेनं बहुमत दिलंय, एक स्थिर सरकार जनतेला हवंय. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पहिल्यापासून राहिली. 2019 पासून 2024 पर्यंत या संवादात अडथळा आला. महाराष्ट्रात दक्षिणेसारखी रक्ताला चटावल्यासारखं राजकारण नाही. पण 2019 पर्यंत जो संवाद होता तो राहिला नाही. मी तो सुरू करेन. आमच्या विरोधी पक्षाची संख्या किती यावरून त्यांना ओळखणार नाही. तर लोकशाहीतलं त्यांचं महत्त्व ओळखून त्यांच्याशी व्यवहार करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
गृह आणि अर्थ खाते कोणाकडे?
एकनाथ शिंदे यांनी गृह आणि अर्थ खात्याची मागणी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपद नसल्याने आपल्या पक्षाला गृह मंत्री अथवा अर्थ खाते द्यावे अशी आग्रही मागणी भाजपकडे करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीमधील सत्ता वाटपाच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र यांनी म्हटले की, पक्षाला सगळी खाती आपल्याकडे असावीत असं वाटतं. पण महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसूनच हे सगळं ठरवतील. गृह खात्याबद्दल चर्चा होती पण त्यावर तणाव नाही. काही खाती असतात ज्यावर चर्चा होत असते. तिन्ही पक्षांना न्याय मिळाला हे दाखवणं गरजेचं असतं. गृह आणि अर्थ खात्याबद्दल चर्चा सुरू आहे, अंतिम निर्णय होईल तेव्हा सांगेन, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
