राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली. नुकताच 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर बोलावलेलं हे पहिलं विशेष अधिवेशन आहे. भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांची या अधिवेशनाच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, आज या अधिवेशनासाठी सर्वपक्षीय आमदार विधान भवनात दाखल झाले. त्यावेळी महायुतीचे आमदार एका रंगाचे फेटे घालून थाटात एन्ट्री करताना दिसले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीच्या आमदांनी घोषणाबाजी केली. तेव्हाच आदित्य ठाकरे हे सभागृहात जात होते. यावेळी पायऱ्यांवरून जाताना आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले, त्यांच्याशी हात मिळवत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही एक पाऊल पुढे येऊन आदित्य ठाकरेंच्या शुभेच्छा स्वीकारल्याचं पाहायला मिळालं.
राज्यात मागच्या काही काळापासून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही नेते एकमेकांबद्दल बोलताना अगदी हमरीतुमरीवर आल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र, आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या दोन मुख्य विरोधी पक्षांचे नेते एकमेकांशी हात मिळवताना दिसल्यानं एक सकारात्मक चित्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. तसंच यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला उभे असलेल्या गुलबाराव पाटलांकडे मात्र, आदित्य ठाकरेंनी सपशेल दुर्लक्ष केलं.
दरम्यान, विधानसभेच्या या विशेष अधिवेशनात आज सत्ताधारी पक्षातील आमदारांनी शपथ घेतली, तर विरोधी पक्षांनी आज शपथ घेण्याचं टाळलं. नाना पटोले, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी I LOVE MARKADWADI लिहिलेले फलकही त्यांनी झळकावले. हे जनतेने दिलेलं मँडेट आहे की, EVM ने दिलेलं आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
मारकडवाडीमध्ये जनतेने मॉक पोल घ्यायची तयारी केली होती, आमचे जिंकलेले उमेदवारही त्याला पाठिंबा देत होते असं आदित्य ठाकरे म्हणाले. मारकडवाडीमध्ये काही लोकांना अटकही केली आहे. आम्ही जिंकून आलो आहोत, मात्र निवडणूक आयोगाबद्दल आमच्या मनात शंका आहे,
EVM बद्दल शंका आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही शपथ घेणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले.
