
बलाढ्य नेत्यानं हाती घेतलं कमळ; राजकीय गणितं बदलणार ?
कोकणातून मोठी बातमी समोर आली आहे. वैभव खेडेकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खेडेकर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतले.
यामुळे कोकणात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. वैभव खेडेकर हे गेले बरेच दिवस पक्ष प्रवेशाची वाट पाहत होते. मात्र आज त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मनसेतून झाली होती हकालपट्टी
वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र काही दिवसांनी ते भाजपमध्ये जाणार असल्याचे समोर आले होते. याआधी तब्बल तीन वेळा खेडेकर यांचा पक्षप्रवेश रखडला होता. मात्र आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मनसेच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका
वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते होते. खासकरून खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महत्वाची बाब म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून खेडेकर हे राज ठाकरेंच्या सोबत होते. मात्र गेल्या काही काळापासून ते नाराज होते. काही कारणामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर ते भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती.
राजकीय गणित बदलणार
वैभव खेडेकर यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खेडेकर हे आता पक्षात नसल्याने मनसेची ताकद कमी झाली आहे. याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. एकंदरीतच वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. याचा नेमका परिणाम काय होतो हे आगामी निवडणूकीतून समोर येणार आहे.