दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात दि.११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत घरोघर,कार्यालये,आस्थापनांवर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी अधिकाधिक संस्था,संघटनांचे सहकार्य मिळवावे.उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.
उपक्रमाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली,त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर म्हणाल्या की,भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक घरावर,कार्यालयांवर,कारखान्यांवर,दुकानांवर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी विविध विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत.
नागरिकांना राष्ट्रध्वज सहज खरेदी करता येईल यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात ध्वज विक्री केंद्रे निश्चित करून त्याच्या माहितीचा प्रसार करावा.उपक्रम राबविताना भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.मार्गदर्शक सूचनांबाबत जाणीवजागृती करावी,असे त्यांनी यावेळी सांगीतले.ग्रामपंचायती,नगरपरिषदा,पंचायती,नगरपालिका,महापालिका,आरोग्य केंद्रे,रूग्णालये,रास्त भाव दुकाने,शाळा,महाविद्यालये.पोलीस,परिवहन आदी विविध यंत्रणांनी उपक्रम राबविण्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे.त्याचे पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे,MSRLM चे जिल्हा समन्वयक सचिन देशमुख,जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी गीता वंजारी,महापालिकेचे प्रतिनिधी तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर,जिल्हा उद्योग केंद्राचे जी.बी.सांगळे,सहायक कामगार आयुक्त राहूल काळे,जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे,क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे,पोलीस निरीक्षक जी.एस.उंबरकर आदी उपस्थित होते.
