
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-नामदेव तौर
परतूर – येथील विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या वतीने जांबसमर्थ येथील मूर्ती चोरीच्या प्रकरणी तसेच आंबा येथील गाईंच्या मृत्यूप्रकरणी आज दि.३० रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तसेच पोलीस ठाण्यात निषेध आंदोलन करून समस्त हिंदू बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जांबसमर्थ या ठिकाणी श्रीरामाचे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये ७०० वर्षांपूर्वीच्या श्रीराम,सीता,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न आणि वीर हनुमानाच्या पंचधातूच्या मुर्त्या होत्या,त्या मुर्त्या अज्ञातांनी मागील १० दिवसांपूर्वी चोरून नेल्या त्यामुळे संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असल्याने या चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तसेच आंबा गावात पोळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेत बागेश्वरी देवीच्या मंदिरातील गाईंचा विद्युत तारांना धक्का लागून मृत्यू झाला.झालेली ही घटना संशयास्पद असल्याची गावकरी सांगत आहेत.संबंधित घटना घातपात असल्याने या घटनेचा पूर्ण तपास करून घटनेला जबाबदार असणाऱ्याला योग्य शिक्षा करण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.झालेल्या आंदोलनात आंबा येथील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे सावता काळे,नामदेव कोरडे,बाळू पठाडे,सतीश बोनगे,बालासाहेब बोनगे,गोरखनाथ झिंजाडे,बाबुराव राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.