
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””'”””””””””””””””
परभणी : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याच प्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली.
सिंधुदुर्गातील आजी-माजी पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून ना. गडकरी यांनी हा निर्णय संपूर्ण राज्यासाठीच घेतला असल्याचे जाहीर केले.
त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासूनच टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगून आमदार, खासदार, मंत्री, स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणेच पत्रकार देखील समाजासाठी झटत असतात, सर्वस्व देत असतात, जीव धोक्यात घालत असतात असेही ते म्हणाले. पत्रकार हा लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, या पत्रकारांना त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर प्रवास करतांना आपणास टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
या भेटीवेळी सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची ती मागणी कशी रास्त आहे, यांचे महत्व गडकरींशी पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे, तर राज्यातील सर्वच पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा ना. गडकरी यांनी केली व तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कोणा पत्रकारांचा अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला, तर त्याला रुपये पाच लाखांचा विमा देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली. तसेच ही सवलत फक्त अधीस्वीकृती धारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील सरसकट सर्वच पत्रकारांना या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तद्वतच ना. गडकरी यांचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याची भावना दै.चालू वार्ता चे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांनी व्यक्त केली आहे.