
भोकर तालूका
प्रतिनिधी विजयकुमार चिंतावार.
शेतात घाम गाळा निश्चितच दीर्घायुषी बनाल असा मौलिक संदेश सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी भोकर येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ता.शाखा भोकर व संदीप पाटील गौड मित्र मंडळ भोकर यांच्या संयुक्त विद्यमानाने माऊली मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी मार्गदर्शन व सन्मान सोहळ्यात बोलताना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेतकरी नेते श्री शिवाजी पाटील किन्हाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी जि.प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील, भगवानराव दंडवे,ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड,संघाचे मराठवाडा सचिव संपादक उत्तम बाबळे, सुभाष पाटील किन्हाळकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शेती अवजारांचे पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व मान्यवरांचा व शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शनात पुढे बोलताना त्यांनी सांगितले आपणाला जर दीर्घायुष्यी बनायचे असेल तर प्रत्येकांनी शेतात घाम गाळलाच पाहिजे.तरच आपण निरोगी बनू शकतो व दीर्घायुष्यी होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या शेतावर कमीत कमी चार ते पाच तास काम करणे गरजेचे आहे.यावर्षी नांदेड जिल्ह्यात २५ जून ते ३ जुलै २०२३ दरम्यान चांगला पाऊस होईल. तेव्हा शेतकऱ्यांनी न डगमगता जमीन नऊ इंच खोल भिजल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. कापसाची लागण करताना शेतकऱ्यांनी लागवडीचे अंतर कमी करून बियाण्यांची संख्या वाढवावी तसेच शेतात उताराच्या बाजूने चर काढावे जेणे करून जास्तीचा झालेल्या पावसाचा निचरा होऊन उत्पन्न चांगले येईल. निसर्गाच्या बदलाप्रमाणे शेतकरी ही बदलला पाहिजे व त्याप्रमाणेच शेतात पिकांचे नियोजन केले पाहिजे तरच आपण टीकाव धरू शकतो. परंपरागत शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करून आपली शेती करणे गरजेचे आहे. औद्योगीकरण,शहरांची झपाट्याने होत असलेली वाढ व राष्ट्रीय महामार्ग यामुळे मोठ्या प्रमाणात झाडाच्या कतली होत आहेत. त्यामुळे हवेतील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम म्हणजे आपल्या हक्काचा पाऊस इतर राज्यात वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून निसर्गाची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे.आदी महत्त्वाच्या बाबी त्यांनी शेतकऱ्यांना सांगून शेतकऱ्यांनी निसर्गाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करावे जेणेकरून निसर्गाचे संकेत आपल्याला ओळखता येतील व भविष्याचा अंदाज बांधून फायदेशीर शेती करता येईल. असा मौल्यवान संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, माजी जि. प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील, शेतकरी नेते शिवाजी पाटील किन्हाळकर आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी केले तर सचिव आर. के. कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मुक्कनवार व विपीन पवनकर यांनी केले तर आभार संदीप पाटील गौड यांनी मानले. या कार्यक्रमास भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक तसेच व्यापारी वर्ग, पत्रकार मंडळी,प्रतिष्ठित नागरिक व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, कमलाकर बरकमकर कोषाध्यक्ष बालाजी कदम, विठ्ठल सुरलेकर, गजानन गाडेकर, शुभम नर्तावार, सुधांशू कांबळे, संदेश कांबळे, संभाजी कदम, विशाल जाधव, अंबादास बोयावार, निळकंठ पडवळे, श्रीकांत बाबळे व संदीप पाटील गोड मित्र मंडळाने मोलाचे योगदान दिले तर या कार्यक्रमास तालुक्यातून असंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती..
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व संदिप पाटील गौड मित्र मंडळाने शेतकरी मार्गदर्शन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करुन आमचा सन्मान केला त्यामुळे आम्हा शेतकर्यांना या कार्यक्रमा मुळे उर्जा मिळाली असुन माननीय पंजाबराव डख साहेबांनी दिलेल्या अंदाजानुसार तालुक्यात पावसालाही सुरवात झाली असल्याने आज शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
प्रगतशील शेतकरी
नंदकिशोर दिगांबर गायकवाड रा.भोसी