विरोधकांना धडकी भरविणारा विजय मिळणार का…
जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचा आज ४७ वा स्थापना दिवस. मागील ४६ वर्षांत दोन खासदारांपासून सुरूवात झालेल्या पक्षाचा विस्तार आज देशभरात झाला आहे.
२०१४ पासून सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता तर तब्बल २१ राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेला कोट्यवधी मतदारांनी साथ दिली. सत्तेचा वारू चौखूर उधळत असताना मागील ४६ वर्षात भाजपला आजवर काही गोष्टी शक्य झालेल्या नाहीत.
भारतीय जनसंघापासून सुरूवात झाल्यानंतर ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला. त्यानंतर चार वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपला संपूर्ण देशात केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. एक उमेदवार गुजरातमधून तर दुसरा आंध्र प्रदेशातून निवडून आला होता. त्यानंतर ३० वर्षांत भाजपने देशात एकहाजीत सत्ता काबीज केली. तेव्हापासून आजपर्यंत भाजप केंद्रात सत्तेत आहे. तर पंतप्रधान मोदी हे सर्वाधिक काळ सरकारचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणारे नेते ठरले आहेत.
महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, छत्तीसगढ, उत्तराखंड, गोवा, हरियाणा, अरूणाचल प्रदेश, बिहार, दिल्ली, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या २१ राज्यांमध्ये सध्या भाजप किंवा एनडीएचे सरकार आहे. पण मागील ४६ वर्षांत काही राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळविता आलेली नाही.
प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची वाटचाल बिकट राहिली आहे. कर्नाटक वगळता एकाही राज्यात पक्षाला एकदाही बहुमत मिळालेले नाही. आजच्या घडीला कर्नाटकातही भाजपची सत्ता नाही. आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलुगू देसमसह आघाडी करत भाजपला सत्तेत स्थान मिळाले. तर तमिळनाडूमध्येही ‘एआयडीएमके’सोबत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी धडपड सुरू आहे.
केरळ आणि तेलंगणामध्ये भाजप किंवा एनडीएला एकदाही सत्ता मिळालेली नाही. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यातही भाजपला सत्तेची चव चाखता आलेली नाही. सध्या केरळ आणि बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. भाजपने प्रामुख्याने बंगालमध्ये सता मिळविण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यंदातरी रेकॉर्डब्रेक होणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
बंगालमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाला आतापर्यंत सत्ता मिळालेली नाही. तीच स्थिती केरळचीही आहे. डावे आणि काँग्रेसचाच या राज्यात वरचष्मा राहिला आहे. ही दोन राज्ये भाजपसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिली आहेत. या राज्यांमध्ये विरोधकांना भाजपने छोबीपछाड दिल्यास हा खरंतर चमत्कार ठरेल. त्यामुळे या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
