
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -शितल रमेश पंडोरे
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अशातच आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, अहमदनगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या शहरांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना आज (29 एप्रिल) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे व विदर्भ वगळता बाकीच्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या (30 एप्रिल) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अशातच दिवसेंदिवस उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र वाढतच चालला आहे. राज्यात मागच्या 24 तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 33 ते 38 अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.